अंधश्रद्धा आणि समाज
जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे. आपण आणि आपला समाज अंधश्रद्धेच्या गर्तेत अजूनच अडकत चालला आहे.आपल्या समाजात अशा कितीतरी अंधश्रद्धा आहेत ज्या आपण त्याला श्रद्धेचा लेप देऊन चालवत असतो. सांभाळत असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर नागपंचमीचे देता येईल. नागपंचमीला नागाची पूजा करतात. महिला त्याला अगदी प्रेमाने,श्रद्धेने दुध पाजताना दिसतात. पण हेच दुध नागाला विषासमान आहे.कारण या दुधामुळे नागाच्या पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊन नागाचा यात मृत्यूही होऊ शकतो. हे खूप वेळा वर्तमानपत्र आणि आकाशवाणीवरून सांगितले जाते पण कोणी ऐकायलाच तयार नसते.रूढी परंपरेच्या नावाखाली हे सुरूच राहते.
नाग गारुडी पुंगी वाजवेल तसा त्या सुरावर डोलतो, एखाद्यावर लक्ष्य ठेऊन बदला घेतो असे म्हणतात.पण खरेतर नागाला ऐकूच येत नाही.ती पुंगी जशी हलते तसा तो डोलत असतो.या सर्व अंधश्रद्धा समाजात आहेतच पण मांजराच्या जाण्या - येण्यावरसुद्धा आपल्या अंधश्रद्धा आहेत.आपण एखाद्या कामासाठी निघालो आणि समोरून मांजर आडवे गेले तर आपले काम होणार नाही असे म्हंटले जाते.मांजर आपल्या वाटेने आणि आपण आपल्या वाटेने त्याचा आणि कामाचा काय संबंध.हे झाले प्राण्याच्या बाबतीत.
चांगल्या कामासाठी निघताना पाण्याच्या कळश्या घेऊन जाणाऱ्या सुवासिनी समोरून आल्या तर शुभशकून आणि एखादी विधवा स्त्री दिसली कि अपशकून मानतात.मग तिला अपशब्द बोलणे. वाईट वागणूक देणे हे चालू होते.चांगले कार्य करताना विधवा महिलेच्या हाताने करायचे नाही. पूजेला तिला मान नाही.अशी तिची अवहेलना केली जाते.तिच्यामुळे काम पार पडणार नाही अशी अंधश्रद्धा लोकांच्या मनात असते. त्या स्त्री ने आपला पती गमावल्याचे दु:ख असतेच आणि यात लोकांच्या बोलण्याची भर पडत असते.
एखादी मुलगी घरात सून म्हणून आल्यावर दुर्दैवाने काही वाईट घडले तर तो तिचा पायगुण समाजाला जातो. आणि पांढऱ्या पायाची अशी अवहेलना आयुष्यभर केली जाते.काही वेळा आजीला असे वाटते कि आजोबाच पुनर्जन्म घेऊन नातवाच्या रूपाने पुन्हा आले आहेत. अशा समजुतीमुळे त्या लहान मुलाचे जास्त लाड केले जातात. कोणीही रागावत नसल्याने तो उद्धटपणे वागत असतो.हे असेच चालू राहते आणि पुढे तो वाईट मार्गाला लागतो.वंशाचा दिवा हा मुलगाच हि अंधश्रद्धा आहे, ती मुळापासून नष्ट करायला हवी.
एखादा बाबा गरिबी दूर करतो,एखादा बाबा रोग दूर करतो अशा बाबांचा आपल्याकडे सुळसुळाट आहे.जर अंगारे धुपारे करून रोग बरे होत असते तर औषधांची गरजच कशाला पडली असती. काहीजण तर योग्यवेळी डॉक्टर कडे न जाता भोंदू बाबाकडे जातात. या अंधश्रद्धेमुळे कोणाचे चांगले तर होतच नाही पण पैसे आणि वेळ फुकट जातो.वेगवेगळ्या माध्यमातून या अंधश्रद्धेविषयी जन - जागृती व्हावयास हवी.
जग चंद्रावर कधीच पोहोचले आहे.आता मंगळाकडे वाटचाल सुरु आहे.पण आपला समाज मात्र एकविसाव्या शतकातसुद्धा अंधश्रद्धेच्या खैतच अजून चाचपडत आहे.
आपला समाज सुशिक्षित तर होत आहे पण तो अजून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील फरक ओळखू शकला नाही.प्रत्येक अंधश्रद्धेच्या मुळाशी जाऊन त्यामागील कारण समजून घ्यावयास हवे. मग अंधश्रद्धा पसरविणारे समाजात राहणारच नाहीत.प्रत्येकाने एका कार्यकर्त्याची भूमिका घेऊन अंध्राश्राद्धेविरुध्द उभे राहावयास हवे.तर आणि तरच आपला समाज अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून प्रगतीच्या प्रकाशाकडे वाटचाल करेल.
Comments
Post a Comment